सोमवार, १६ एप्रिल, २०१८

एक संध्याकाळ मंतरलेली...........!

एक संध्याकाळ मंतरलेली...........!

     मराठी "गझल" साम्राज्याचे अनभुशिक्त सम्राट आदरणीय गझलकार  सुरेश भट यांच्या जयंतीनिमीत्त कल्याण पु.ल. कट्टा येथे  कल्याण काव्यमंच व  चारमित्र  यांच्या संयुक्त विद्यमाने "गझल सरीं" हा मराठी गझल मुशायराचे आयोजन केले होते.

     एेन रणरणत्या उन्हाळ्याच्या दिवसातली कालची संध्याकाळ रम्य अगदी मंतरलेली होती.  एक डेरेदार पारंब्यांनी मढलेला हिरव्यागार वृक्षाचा पार म्हणजे व्यासपीठ आणि त्याच वृक्षाच्या विशाल  खांद्यावर कल्याण काव्यमंच व  चारमित्र  या साहित्य चळवळीचे दिमाखदार बैनर बस्स !
      हया नैसर्गीक नेपथ्याच्या पार्श्वभुमीवर आजच्या गझलसरींची बरसात रंगतदार होणारच  हे गझलसरींमध्ये चींब भिजण्याच्या लालसेने आलेल्या रसिकजनांच्या उदंड प्रतिसादावरून दिसत होतेच....!
या गझलमुशाय-यात  महाराष्ट्रातील नवोन्मुख युवा तसेच ज्येष्ठ गझलकार असा सुंदर समन्वय साधून "गझलसरींचा " वर्षाव हा नुसता मनाला चींब करणारा नाही तर अंतरमनातील सृजनतेला साद घालणारा होणार हे निश्चित हेते.!
        थोडयाचवेळात हे स्थिर शांत चित्र सजीव होत गेलं ते कल्याण काव्यमंच चे हरहुन्नरी उत्साहr आणि कविता म्हटले की आनंद सागराचा तळ ढवळून काढणारे श्री. सुधीर चित्ते सरांनी आपल्या जादुई शब्दांतून प्रस्तावना करायला सुरूवात केली तेव्हा!  या खास या कार्यक्रमासाठी आलेल्या श्री. संदिप गुप्ते  ज्यांनी 76 वा गझल मधील  "दिवाण"  लिहीला त्यांचे खास स्वागत करण्यात आले.  श्री. संतोष हुदलीकर हे खास सपत्निक नाशिकहून या कार्यक्रमासाठी आले होते त्यांचेही स्वागत करण्यात आले!  उत्साही प्रस्तावने नंतर प्रत्यक्ष "गझलसरी"  मुशायराची प्रमुख सुत्र  कल्याण काव्यमंचचे ज्येष्ठ गझलकार श्री. प्रशांत वैद्य यांच्याकडे सुपूर्द केेली....!
     श्री. प्रशांत वैद्य म्हणजे "गझल" मधील दादा माणूस !

शेवटी शेवटी जेव्हा मला मी उमगलो होतो
आतल्या आत मी तेव्हा खुपदा बरसलो होतो !

अशा या मनस्वी आणि संवेदनशील गझलकाराने अतिशय प्रसन्नतेने गझल मैफीलीची सुरूवात करून देतानाच ......

नेल्या जरी उन्हाने माझ्या गझलसरी
आल्या पुन्हा नव्याने माझ्या गझलसरी!

अशा सुंदर शेराने मुशाय-यात सामील सर्व गझलकारांचे सुंदर स्वागत केले.....!

प्रत्येक शायर ची ओळख म्हणजे त्याचा एक एक शेर असतो याचा प्रत्यय मग सामील प्रत्येक गझलकाराच्या गझलीयत मध्ये दिसत गेला....!!

विजय उतेकर मुंबई....

होतात वार सारे पाठीवरीच माझ्या
तू वार मोजताना मागून मोजणी कर  !

किंवा
सुर्य कलतो जीवघेणा काळ येतो
सावल्या मी चोरल्याचा आळ येतो..!

स्पर्श झाला जुना झाल्या जाणिवा
शहारा हा तरी तात्काळ येतो...!

 तसेच

पाहुनी लगबग समाधीवर फुलांची
चार स्वप्ने आत्महत्येवर निघाली!

असे एकापेक्षा एक जीवघेणे शेर आणि मैफील रंगत गेली... क्षणात मुग्ध झाली......

जयश्री कुलकर्णी नाशिकच्या तरूण युवा शायरा... !

अतिशय सयंत तरिही टोकदार शायरी....
 वाटे वाटे नको नको जे वाट्यास येत आहे
करतोस तुच दैवा गोलमाल हा बहुदा ...!

किंवा -

ईतके कुठून आले रस्त्यात खाचखळगे
तत्वानुसार केली वाटचाल बहुदा ...!

क्या बात  क्या बात रसिंकांचा उदंड प्रतिसाद.... आणि मैफल रंगत होती, सोबत प्रशांत वैद्यांचे सुत्रसंचालन हास्य आणि मिश्किली बहार आणत होते....!  दर्दींची गर्दी वाढत होती....
मध्येच प्रेमळ अपर्णाताईची , चित्ते सरांची रसिक प्रेक्षकांना पाणी चहा देण्याची लगबग आणि तत्परता पाहून कार्यक्रमाच्या नियोजनाला दाद मिळत होती.!

आणि मग अजित मालंडकर यांच्या तरंन्नुम मध्ये सादर केलेल्या गझल म्हणजे मुशायराची चढती कमान होती....




बुधवार, २० एप्रिल, २०१६

"मनोगत"

                                                                    "मनोगत" 
                                                                                                                             २५/४/२०१६

     खरं  प्रेम आपल्या आयुष्यात जाणता अजाणता अगदी नकळत येतं , माझी कविता सुध्दा अशीच नकळत माझ्या आयुष्यात आली आणि आयुष्यच होऊन राहिली ! खरं  तर प्रत्येकाच्या आयुष्यात कविता असते !
कारण कविता म्हणजे सारं भोवतालचं सोसणं असतं , कविता म्हणजे आपणच आपल्याला उसवणं असतं 
कविता म्हणजे एक टाका असतो आपण आपल्याला घातलेला , कविता म्हणजे प्राण असतो जगण्यामध्ये ओतलेला !
माझ्याच कवितेत कवितेला व्यक्त करतांना     .....

"भोवतालचं सोसणं
जेंव्हा असह्य होतं
नाती फाटत , तुटत
भावना उसवत जातात
तेंव्हा तूच येतेस   ....
एक एक टाका टाकत जातेस
सांधत जातेस मला  .
विस्कटलेल्या आयुष्याला
स्वप्नांची ठिगळं लावतेस
सजवून जातेस असं काहीं 
निळ्याभोर आकाशालाही
वाटत राहतं   ....
चंद्रचांदण्यांच्या जागी
स्वप्नांची ठिगळं
शोभून दिसतील !!"

     माझ्यासाठी कविता म्हणजे माझा माझ्याशीच केलेला संवाद असतो ! कविता माझी सर्वात जवळची सखी आहे  .  माझं व्यक्त होणं आणि माझं असणं  यातील खरा फरक माझी "कविता"  मला दाखवून देते , ती माझ्या ख-या अस्तित्वाची ओळख करून देते ! ती माझ्या मनाचा "आधार" आहे , माझ्या जगण्याशी तिचं अतूट असं  नातं आहे !  आयुष्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत माझी कविता सतत माझ्या सोबत होती , तिने मला कधीच "एकटे " पाडले नाही! खरं तर तिच्यामुळेच मी इथवर न कोलमडता, न  मोड़ता, न हरता पोहचले आहे ! माझं जगणं जसे होते तशी ती  माझ्या सोबत राहिली ! खरं तर मी आनंदात असेन  तर ती  फारशी माझ्याकडे फिरकायची  नाही पण जेंव्हा मी  दुःखी , विरह वेदनेत असले  की ती  आवर्जून माझ्यापाशी माझे दुःख हलके करायला येते! " कविता" म्हणजे माझे  "मी" पण आहे! त्यामुळे मला माझ्या आयुष्यात आणि भोवतालच्या जगाकडून जसजसे अनुभव येत गेले तसतसे माझ्या कवितेचे भाव बदलत होते !  त्यामुळे तीचा अनुभव सार्वत्रिक असावा असे मला प्रमाणिक पणे वाटते ! उदा. प्रेमकवितांमधील भाव तर प्रत्येकाच्या ठायी
अगदी  सार्वकालिक आणि सार्वत्रिक असा असतो ! कारण कुणीतरी म्हटलंच  आहे  की ,
" जरुरी नहीं जो शायरी करें , उसे इश्कही हों  ....!!
जिंदगी भी तो कुछ जख्म लाजवाब देतीं हैं  .... !!
आणि म्हणूनच कदाचित माझ्या इतर विषयांच्या कवितांपेक्षा प्रेम कवितांना ब्लॉग वाचकांकडून खुपच चांगला प्रतिसाद मिळाला  !  उदा  .   " आधी मला सांग , तू माझ्या स्वप्नात यायचं बंद का केलंस  ...? " ही कविता आजच्या तरुण पिढीच्या भावविश्वशी जोडून लगेच भिड़ते ! 

     प्रत्येकाच्या आयुष्यातील अनुभव हे त्या प्रत्येकासाठी "मास्टरपीस " असतो  .  माझ्या आयुष्याकडून मीही असेच बरेचसे घेतले आहे   ! आजूबाजूच्या परिस्थितीशी प्रत्येकजण जोडलेला असतो पण प्रत्येकाची त्या जोडण्याची  एक वेगळी प्रतिक्रिया उमटते ! एकच अनुभव पण प्रत्येकाचा  तो अनुभव व्यक्त  करतानाची भूमिका वेगळी असते ! मीही ते अनुभव कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले ! स्रीविषयक जाणिवा प्रत्येक स्रीच्या मनात असतातच पण व्यक्त करण्यासाठी त्यांचे भाव वेगळे असतात !  माझ्या ह्या जाणिवा व्यक्त होताना त्या एका  " मी"  कडून जेंव्हा सुरवात होऊन त्या प्रत्येक स्रीच्या अनुभवाशी जाऊन भिडतात तेंव्हा ती जाणीव फक्त माझी राहू नये ती प्रत्येक स्रीची व्हावी असा माझा प्रयत्न असतो   " इतकं सोप्प नसतं गं " ही कविता लिहितांना माझे स्रीत्व सोप्प नाही ते पेलतांनाचा मला येणारा  अनुभव आहे  ! किंवा " जेंव्हा तुझा राग तू भांड्यांवर काढतेस ..!" ह्या कवितेतही जाणते अजाणतेपणे मी मला व्यकत करते आहे  . तो अनुभव इतर स्रीयांचा ही होऊ शकतो   !
     
    भवतालच्या भ्रष्ट  वातावरणाचे  आपल्या संवेदनशील मनाला पडणारे चरे अगदी आत आत खोलवर चिरत असतात त्यातून  व्यक्त होतानाचा प्रत्येकाचा त्रागा   हा त्या त्या व्यक्तिच्या  स्वभावप्रकृतिप्रमाणे कधी दाहक बंडखोर असतो तर कधी शरणागत असहाय असतो  ! माझ्याकडून आलेला भाव हा दाहक आहे याची प्रचिती माझ्या "इति  मनूष्य मनूष्य:" या सारख्या कवितांमधून येते  !

     अशा  कवितांच्या माध्यमातून  जाणिवेचे नेणिवेचे प्रकटीकरण करत असतांनाच  कवियत्री नीरजा यांच्या "निरन्वय" या काव्य संग्रहाच्या प्रस्तावनेच्या शेवटी प्रा. गंगाधर गाडगीळ  यांनी म्हटले आहे , " कविता म्हणजे कारागिरी नव्हे तर ते एक व्रत आहे ; या गोष्टीची खुणगाठ कवितेने  मनात जपली पाहिजे तरच तिला आपले स्वत्व गवसेल व ती  स्वसामर्थ्याने वाटचाल करू लागेल " हे वाचनात आले आणि हे वाचल्यानंतर खरंतर मला खूप दडपण आले कारण माझी कविता ही माझी अभिव्यक्ती  होती ती व्यक्त होतांना जशी माझ्या आत होती तशीच ती बाहेर येत होती , त्यामुळे माझ्या व्यक्त होण्यात प्रतिभा , तिचे स्वत्व या गोष्टींचे भान माझ्या कवितेत कितपत होते ह्याची मला काहीच जाणीव नव्हती कारण ती माझ्या भावविश्वाशी  अगदी प्रामाणिक होती नव्हे ती माझ्यातल्या जाणिवेची प्रतिक्रया होती  . पण कविता जेंव्हा माझ्या जाणिवेपलीकडे इतर वाचकांच्या जाणिवा ही व्यक्त करेल तेंव्हा मला तिच्यातला खरेपणा अधिक खरा वाटेल आणि म्हणून माझा लहान भाऊ रवींद्र याच्या मदतीने मी माझा कवितांचा ब्लॉग तयार केला आणि  अगदी एक वर्षात त्याला साठ हजरांच्यावर वाचक मिळाले मग मला थोड़ा धीर आला आणि माझ्या मित्र मैत्रिणींना माझ्या कविता व्हाट्सअप , फेसबुक या द्वारे प्रसारित करू लागले तिथेही कवितेतील चांगली जाणती प्रथितयश माणसे ,प्रगल्भ वाचक यांच्याकडून कौतुक आणि मार्गदर्शन मिळत गेले. 

    थोडक्यात कवितांच्या जाणिवे नेणिवेतूनच मी वाचकांमध्ये सामील होऊन हा माझा अनुभव खरच सार्वत्रिक आहे का। ..? या एका जिज्ञासेने " माझे तुला नि:शब्द शब्द " हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला !  " माझे तुला नि :शब्द शब्द"  या शीर्षकातून माझ्या रसिक वाचकांपर्यंत मी माझ्या व्यक्त शब्दांतून पोहचण्याचा प्रयत्न केला आहे  .

                                                                    "  कृतज्ञता  "

     कवितेतील माझी पहिली प्रेरणा आदरणीय  कवयित्री  आसावरी काकडे  यांना या काव्यसंग्रह निर्मितीचे विशेष श्रेय देणे माझ्या साठी गुरूला दक्षिणा दिल्याचे समाधान मिळवून देत आहे .

      या काव्यसंग्रहाच्या निर्मितीचे पहिले श्रेय मी माझे बाबा श्री .  विठ्ठल गोपाळ विशे यांना देते . कारण ग म भ न या अक्षरांपासून ते शब्द आणि शब्दांचे भव्य आकाश माझ्या बाबांनी मला दाखवले ! माझ्यात वाचनाची आवड निर्माण केली  , कविता गोष्टी, कथा अशा  विविधतेने नटलेल्या ग्रंथसंपदांची ओळख करून दिली . कविवर्य अरुण कांबळे यांच्या कवितेचा संदर्भ घेऊन माझ्या बाबांना सांगावेसे वाटते " आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झाला  आहे , नाहीतर हेच शब्द कुठेतरी पडून सडून गेले असते,  माझ्या शब्दांना अर्थघनता दिल्याबद्दल मी तुमची ऋणी आहे बाबा। .. !! 

    "तुझ्या ह्या कविता वाचकांपर्यंत जाण्यासाठी प्रथम त्या तुझ्या म्हणून जपल्या पाहिजेत " असे माझ्या कवितांचे मोल जाणणारे माझे पती श्री . संतोष विनायकराव कर्वे यांनाही या काव्यसंग्रहा  निर्मितीचे हे श्रेय जाते.  

     मैत्री करणे आणि तिच्या सहवासातून परागकण मिळावेत ज्यातून एक नवीन सृजन निर्माण व्हावे अगदी तोच अनुभव मला माझ्या मोजक्याच पण अतिशय प्रिय असलेल्या मैत्रगणातून येत असतो ! माझ्या कवितांचे कधी  कौतुक करून व प्रसंगी कवितेतला फोलपणा दाखवून नेहमीच मला मार्गदर्शन केले आहे . विशेषत: डॉ . प्रतिभा टेंबे  आणि शारदा मंदिर कर्जत-(जि . रायगड ) शाळेची मुख्याध्यापिका सौ . आशा सुनील ठोंबरे यांनी कविता संपादनात आपल्या व्यग्रतेमधून मला मोलाची मदत केली त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे ! शारदा प्रकाशन चे  प्रकाशक प्रा  .   संतोष राणे  यांनी माझ्या कवितांना प्रकाशित करुन एक नवा आयाम दिला  त्यांचेही मी मन:पूर्वक आभार मानते !

    सर्वात शेवटी मी माझ्या आयुष्यात आलेले ज्ञात अज्ञात सगेसोबती ज्यांनी माझ्या आयुष्याच्या ओंजळीत अनुभवांचे कधी चांदणे तर कधी जळते निखारे दिले त्या सर्वांचे मनस्वी आभार !  आणि "काही गाणी गुणगुणता येत नाहीत ती मनातच जपावी लागतात " त्या गाण्यांचेही  आभार !!

                                                             " अर्पण पत्रिका "



                                                         "  श्रीकृष्णार्पणमस्तू "


                                                                                                          सौ . पुष्पांजली संतोष कर्वे

सोमवार, १० मार्च, २०१४

हिम वृष्टि  सौंदर्य  निसर्गाचे   रूप  अपरुप… माणसास कधी अप्रूप  केवढे     … कधी  धाय मोकलूनी रडवे     ....!!!!

गुरुवार, १४ मार्च, २०१३

*****सखी******



 "पत्रव्यवहाराने प्रेम करणे, हा प्रेमाचा आदर्श प्रकार आहे...! याचे प्रत्यंतर देणारी कादंबरी म्हणजे लेखक वामन देशपांडे यांनी लिहिलेली *सखी* हि एक आदर्श कादंबरी आहे....! ज्याचे कवितेवर प्रेम आहे त्यांच्यासाठी हि कादंबरी म्हणजे काव्याझुल्यावर झुलल्याचा आनंद लुटल्या सारखे आहे.

     एक 'तो ' आणि एक 'ती ' दोघांचेही कवितेवर प्रेम ... 'तो ' लेखक तर 'ती' एक काव्य रसिक.  "कविता" या एकाच  समान धाग्यामुळे  एकमेकांना प्रत्यक्ष न भेटलेली पण पत्रमैत्रीने झालेली ओळख त्या दोघांमध्ये त्यांच्याही नकळत काव्यमय नाते विणत गेली .  या वीणेत एक एक वीण आतुर, व्याकुळ,  भावविव्हल धाग्यांनी गुंफली होती ... त्यांची हि वीण इतकी घट्ट होती कि , एकमेकांच्या संवेदना त्यांना पत्रातील अक्षरांमधून हृदयाला भेदून जात होत्या ...!

     दोघांचेही जीवन दुख:रुपी एकाच नावेत प्रवास करीत होते. सखीचे आयुष्य वसंत ऋतूच्या आगमनालाच शिशिर ऋतूची दृष्ट लागावी तसे फुल फुलल्या नंतरचे सुख तिला मिळालेच नाही.... तिचा सुगंध दरवळण्यापुर्वीच पाकळ्यांच्या कुपीत नियतीने तो बंद केला ...!

     'त्याचे' आयुष्य दिशा हरवलेल्या तारुसारखे एकटेच भरकटत होते.  अगदी पहिला सुरातला संसार असूनही त्याच्या सुरांमध्ये न गाणारा ..... शेवटी तोच त्यांच्यात बेसूर ठरला.. आणि वेगळा, अगदी एकटा ... एकटा पडला......!!

     या अश्या काळात 'ती' व 'तो' यांची ओळख झाली .... हि नुसती अक्षर ओळख त्यांनी एकमेकांना  लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून अशी झिरपत झिरपत त्यांच्याही नकळत त्यांच्या अंत:करणात प्रेम होऊन व्यापून राहिली .....! प्रत्येक पत्रात त्यांनी आपल्या निशब्द भावनांचे वर्णन कधी कवी ग्रेस, पाडगांवकर , बोरकर, बालकवी , कवी महानोर,संगीता जोशी, नीता भिसे , मराठी गझलचे महामेरू कवी सुरेश भट यांच्या विविध भावनांनी ओथांबलेल्या काव्यानि केले आहे. आणि अशी काव्यात्मक कादंबरी वाचण्याचा आनंद आपल्याला अनुभवाच्या एका विशिष्ट उंचीवर नेउन ठेवतो.उदा:

     जेंव्हा त्याचे दुख: तिला कळते ... त्याच्या दुख:ने ती खचून जाते .. त्याच्या दुख:त साथ देण्यासाठीच आश्वासन व्यक्त करते ते कवी ग्रेस यांच्या कवितेतून ....

              " रात्र थांबवूनी असेच उठावे
                तुझ्या पाशी यावे क्षणांसाठी
                डोळीयांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेठी
                आणि दिठी दिठी शब्द यावे .....

               तुही थेंब थेंब शब्दासाठी द्यावा
               अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी
               आणि उजाडता पाठीवर ओझे
               वाटे पाशी डोळे तुझे यावे.....!


किंवा याच संदर्भात नीता भिसे यांची गझल

              " तुझ्या घराला तोरण, माझे बांधले दिवस
                तुझ्या दाराशीच सारे , माझे थांबले दिवस

                एक एक गोळा केला तुझ्याबरोबर क्षण
                नको समजूस मनी तुझे सांडले दिवस

               आता बोलणेही नाही आता भेटणेही नाही
               खंत करण्यासाठीही कुठे राहिले दिवस ....?

               काय घडून जे गेले , तुझ्या ध्यानी मनी नाही
               मला कळण्यासाठीही किती लागले दिवस .....

               पाने वाळली जातात, खोड वठली जातात
               हिरवेगार राहतात कसे आतले दिवस .....!

अश्या अनेक कविता कादंबरीभर प्राजक्ताचा सडा  पडावा तश्या उधळल्या आहेत.....!

     'ती' आणि 'तो' सुद्धा या काव्यमय झुल्यावर झुलत स्वप्नांचे , कल्पनांचे इमले बांधत त्यावर त्यांना मिळालेल्या आनंदाची तोरणे बांधत नव्या जीवनाला ते नव्या दिशेने नेत होते ....! त्याच्या प्रेमकहाणीत सखीने रंग भरले .... त्याच्याच रंगात रंगून आपल्यापुढे तिने सुंदर रांगोळी काढली .. त्या रांगोळीत त्याचेच रंग भरून त्याची वाट  पाहत राहिली...!

     दोघेही भेटण्यासाठी आतुर व्याकुळ होते... पण तरीही ती आणि तो शेवटपर्यंत एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेच नाहीत... ती तशीच आपल्या उंबरठ्यापाशी त्याची वाट  पाहत ... त्याच्या दु:खात दु:खाप्रमाणे साथ देण्याचे आश्वासन देत आपल्या मांडीवर त्याचे डोके ठेवून त्याला जोजावन्याचेही तिने सांगितले  पण ....... तो नाही आला .....!

     'तोही  व्याकुळ आणि असहाय्य होता ....! ह्या पूर्ण कादंबरीचे वाचन करतांना  आपण त्यात इतके गुंतले जातो कि ,'ती' व 'तो' आपण आपल्यातच जगायला लागतो ...!त्यांचे उत्कट प्रेम आपले मन व्यापून जाते...!  ह्या कादंबरीचे शेवटचे विवेचन वाचतांना हृदयात एक कळ उठते ..... त्यांचे प्राक्तन त्यांना एकमेकांना अखेरपर्यंत नाही भेटू देत...!  दोन प्रेमिजीवांमधील शत्रू त्यांचे प्राक्तन... नियती ठरते...!

      कादंबरीचा शेवट .... "त्याच्या शेवटच्या पत्रातल्या दोन ओळीतून सुटलेल्या जागेत त्याची अखेरची व्याकूळता , असहायता दिसत होती...! ह्या पत्रात त्याची खाली सही नव्हती ... तर अश्रूत विरघळेलेले अक्षरांचे पुंजके .....!

     त्या पुंजक्यांचा अर्थ लावला ... तर तो  अत्यंत वेदनामय असा होता...!  पत्रात सोडलेल्या दोन ओळीतील जागेत त्याची व्याकुळता,विरहवेदना , दु:ख दिसत होते...!  ज्या रात्री पत्र लिहिले रात्री नदीत दिवे सोडावेत तसे  त्याने स्वत:ला झोकून दिले होते ...! त्या दिव्याबरोबर वाहत वाहत तो पलीकडच्या तीरावर गेला जिथे गोकुळातील त्याची सखी (मनु ) राधा त्याची वाट  पाहत होती.... आणि वैकुंठातल्या घंटा त्याला ऐकू येत होत्या...! "तिला  तिचे प्राक्तन कळले होते ....."राहिले ....दूर...घर....सख्याचे....!

     ही काव्यमय कादंबरी प्रत्यक्ष वाचणे हा एक अत्यंत सुंदर अनुभव ठरावा...! कधीही न कोमेजणारी..... प्रत्येकाला आपले मन हिरवेगार ठेवणारी भावना म्हणजे "प्रेम"  याचा अनुभव देणारी हि कादंबरी आहे ...! आयुष्याच्या वैशाख वणव्यातही वसंत ऋतूचा आनंद देणारी अशी हि कादंबरी आहे...! 

    माझ्या सहवाचन कट्ट्या वरील सर्व मित्र मैत्रीणीनी   हि कादंबरी जरूर जरूर वाचावी  आणि काव्यमय झुल्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा ..... आणि आपला स्वत:चा वेगळया अनुभवाचा अन्वयार्थ लावावा  ......!!!!!

कादंबरीचे नाव:    *सखी*
लेखक        :    वामन देशपांडे
प्रकाशिका     :    सौ. सुरेखा करंदीकर
प्रथम आवृत्ती  :   ३० ओगस्ट , १९९३.

बुधवार, १६ जानेवारी, २०१३

एक लडकी को देखा तो ........!!!!


    

कॉलेज कट्टा म्हणजे आम्हा कॉलेज तरुणाईचा कलाविष्कार करण्याचे एक खुलं व्यासपीठ.   याच कट्ट्यावमधल्या ब्रेक मध्ये 

किंवा लेक्चर बंक  करून बसायचं आणि पक्याच्या पकवणा-या कविता नाहीतर अन्याचं   कितव प्रकरण ....?पासून तर हल्लीच्या 

२६/११ च्या हल्ल्यावर येथेच्छ चर्चा सत्र घडवायचं .......यातून निष्कर्ष   विदाऊट  उत्कर्ष  "झिरो".... ( आपल्याकडच्या "चौकशी 

समिती" अहवालाप्रमाणे ....)  याच कट्ट्यावर अनेक प्रेमवीर नजरेची " गोफण "  घेऊन बसलेले असतात, अन मग "पहाताच ती

बाला ....कलिजा खलास झाला.....!" आणि मग स्वत:च घायाळ होतात .एखादीने दिलेला   नजरेचा आडवा - तिडवा कटाक्ष  कटाक्षाने 

टाळत दुसरा कटाक्ष कैच (कि कैश...? )  करायचा . असा हा तरुणाईचा बहर ....!आणि तरुणाईच्या या बहरात प्रत्येकजण न्हाऊन 

निघतो !!

      त्या  दिवशी मी व नुपूर  वर्गातून बाहेर पडलो .  तसं सकाळपासून आमच्या लक्षात आलं होते , दोन मुलं आमचा  पाठलाग  

केल्यासारखे मागे मागे आहेत ..... म्हणून मुद्दाम आम्ही कट्ट्यावर बसण्यापेक्षा लायब्ररीत जाऊन बसायचे  ठरविले.  ( अश्या 

ठिकाणी या प्रेमवीषाणूचा उपद्रव कमी असतो .)  अनं झालेही तसेच .  ते दोघेही बाहेर व्हरांड्यातच  थांबले असावेत..?   पण अचानक

त्यांच्या पैकी एक आमच्यासमोर उभा   "एक्सक्यूज मी मिस ...? त्याने नुपूरकडे पहिले, तुमच्याशी थोडे काम होतं ..." मी मधेच 

 विचारले काय काम आहे.....? मी जवळ जवळ खेकसलेच .( माझा नुसताच न घाबरल्याचा अविर्भाव .) मनातून दोघीही जाम 

घाबरलो होतो. "थोडा वेळ तुम्ही बाहेर याल का...?त्याचा प्रश्न.  नुपूरने प्रश्नार्थक  नजरेने  माझ्याकडे पाहिले.  आजूबाजूची मुले 

आमच्याकडे पाहातात कि काय असं वाटून आम्ही लायब्ररीबाहेर  आलो.  तर जीन्याजवळच  त्याचा दुसरा साथीदार उभा. " तुम्ही 

एकट्याच चला .."  त्याने  नुपुरला असं सांगताच नुपूरने  माझा हात घट्ट पकडला ... तिचा हात थरथरत होता ..."  मीहि तिच्या 

सोबत येणार ..." मी  उसने अवसान  आणून  त्याला ठणकावले.  त्याचा नाईलाज झाला असावा ... शेवटी आम्ही त्या जिन्याजवळ 

उभ्या असलेल्या  मुलाजवळ गेलो ,  परंतु नुपूर बरोबर मला पाहताच त्याचा चेहरा अगदीच पडला .  "एक्सक्यूज मी मिस"...?  तुम्ही 

 जरा तिकडे थांबता  का...? (मला पिटाळाचा शेवटचा निष्फळ प्रयत्न ...)  नाही ती इथेच थांबेल ... तुमच काय काम आहे ते सांगा ..." 

 नुपूरने  माझा हात अधिकच घट्ट पकडत त्याला चांगलेच ठणकावले . काय बोलावं .... कसं बोलावं .....या  संभ्रमात 

तो  पडला....त्याला काय बोलायचे आहे हे खरं तर आमच्या दोघींच्या लक्षात आले होते.   मला अश्या   प्रपोजलचां अनुभव  अगदी

 एकीव होता , तो असा लाइव बघायला मिळणार म्हटल्यावर माझी उत्सुकता शिगेला पोहचली होती ... ( पण चेह-यावर मी अगदी 

धीरगंभीर भाव आणण्याचा आटोकाट प्रयत्न क्जीत होते )  शेवटी त्याने उत्सुकतेचा बांध  फोडला .  नुपूर तू मला आवडतेस ...(हा 

एकदम तुम्ही वरून तू वर आला होता ) मला मनात कसेसेच झाले. गेली दोन  वर्ष  मी तुला बघतो ... खरं सांगायचे तर मी

अभ्यासही धड करू शकत नाही ..."( हा सप्टेंबर .. आक्टोबर महिना  ....म्हणजे  एटी केटी इथेही उजेडच म्हणायचा ...!) एखाद्या 

राखीव खेळाडूला मधल्या फळीत खेळायचा चान्स मिळावा  आणि   त्याने जमतील तसे आडवे-तिडवे स्ट्रोक मारावेत अगदी तसाच

 त्याचा प्रपोजल स्ट्रोक मारण्याचा उत्साह बघून मला  त्याची कीव करावी कि कौतुक .....? काहीच समजत नव्हते... पण एकीकडे

 नुपूर  थरथरत होती .... हात घामेजले होते.  मग मलाही हा प्रकार असह्य झाला  नुपूरला  मागे सारत मी त्याचा चांगलाच   समाचार 

घेतला .  " तुम्ही कॉलेजला कशा  साठी येता...? शिकण्यासाठीच ना ...? मग अभ्यास सोडून हे असले उद्योग  करायला काहीच कसे

वाटत नाही.कशाचीही  भीडभाड न ठेवता अश्या थिल्लर वागण्या बोलण्याने तुम्ही कसली   प्रेमाची याचना करता ...?आधी  शिका 

....कमवा....  आणि मग विचारा .....! एका दमात मी त्याला  सुनावलं ... आणि  त्याच्याकडे न बघताच  तडक  तिथून निघून गेलो.

 

       या  अश्या अनेक प्रेमाच्या त-हा ...! ज्या कधी जीव देण्या इतक्या तर कधी जीव घेण्याईतक्या त-हेवाईक ठरतात...!  निस्वार्थ ,

 निर्वाज्य.. प्रेम आता कुठे आहे...?  एकतर्फी प्रेमातून  झालेल्या जीवघेण्या घटना आपण रोज वाचतो...हे  कसले प्रेम.....? तिचा

 नकार त्याच्या पुरुषार्थाचा अपमान समजून तिच्याबरोबर  क्रूर खेळ खेळायचा ... आणि प्रत्यक्ष   प्रेमालाच पेटवायचे ...? प्रेमावरच 

सपासप वार   करायचे...?  पण तिचा नकार त्याला नसतो .. त्याच्याकडे नसलेल्या  कतृत्वाला  असतो.."तिचा "नकार "तिचा"

नसतो... तिला असलेल्या सामाजिक नीतीनियमांच्या  मर्यादांचा आणि   सद्सद्विवेक बुद्धीचा असतो .... पण हे त्या अधीर.

 अघोरी.... तरुणांना कधीतरी कळेल का.....??????  

 

                                                                                  "समिधा "

 

 

 


शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३



      

                                   "तिची कहाणी "


    आज फारच एकटे  वाटते म्हणून तुला फोन केला...... पलीकडून तिचा आवाज!..... आणि मग मीच थोड़ी स्तब्ध झाले ..... काय बोलावे काही समजलेच नाही     ती मात्र खुप  काही बोलायाचे आहे म्हणून आतुर वाटली.  मी भानावर आल्यासारखी, अगं बोलना.....!. मला भेटशील का?  ती  मला तिच्याबाबत पूर्ण सहानुभूति होती पण मी माझ्या संसारातिल रोजच्या व्यावाधाना मध्ये  पार बुडून गेले होते........ हो नक्कीच....! मी .  पण मला खरेतर अजिबात वेळ नव्हता   लेकीला शाळेत सोडायचे होते, नव-याने बँकेत जाऊंन एफडी क्लियर करायला सांगितले होते,  घरातील कामे ...... माझ्या डोळ्यासमोर सर्व कामे भरभर नाचु  लागली......पण तिला  मी नाही म्हणु शकले नाही  .  हो! येते ना! पण  आज जमणार नाही उद्या येऊ ?  पण  येशील  ना?  तिचा अगतिक प्रश्न?  हो उद्या संध्याकाळी भेटू या ...मी .  पान माझ्या घरी नको आई असेल .... आणि तुला पाहून उगीचच वैतागेल ...... ती . आपण बाहेर आपल्या नेहमीच्या मंदिरात भेटू या ? मी .   हो चालेल ..... तिने फोन ठेवला .......!


         मला आज उद्याची कामेही आज करणे  भाग होते ..... भर भर कामाला लागणे आवश्यक होते ....... पण मी मात्र थंड  होते .   उद्या ती भेटणार आहे .....  माझ्याशी तिला काय  बोलायाचे आहे ?  तिला मी अधून मधून फोन करत असे ....मध्ये एकदा तिला भेटले होते पण तिची ती विचित्र अवस्था आणि तिला होणारे भास् मी तेंव्हाच फार घाबरले होते पण तरीही तिला धीर देण्यासाठी मी तिच्याशी खुप बोलले ... तिला  खुप सावरन्याचा   प्रयत्न केला होता पण ......? त्यानंतर भेट नाहीच ..... खरतर तीच मला फोन करायची पण मी जुजबी काही तरी बोलत रहायची .. ती  मात्र उत्साहाने तिचे नविन उपक्रम सांगत असायची .... मी तिचे तोंडभरून कौतुक करायची ... तिला प्रोत्साहित करायचे पण तिला प्रत्यक्षात  मात्र कधी भेटले  नाही .....  फक्त एकदाच,   तिच्याच लग्नात ......! 


        संध्याकाळी मुलीला स्केटींग क्लासला सोडले आणि मी मंदिरात पोहचले  ..... ती  कुठेच दिसली नाही ... मी मंदिराच्या बाहेरच्या चौथ-यावर बसून विचार करत होते . एवढ्यात ती आलीच ..... ती आली आणि मी पाहतच राहिले ..... चेह-यावर वयाच्या  खुणा दिसू लागल्या होत्या ,  शरिर सुटले होते ... खर  तर  ती माझ्यापेक्षा एखाद वर्षाने लहानच होती पण  आता तिच्याकड़े पाहून मात्र  ती  प्रौढा वाटत  होती .  मी स्वतः ला सावरले ..... भेटल्याचा खुप आनंद चेह-यावर आणून तोंडभरून हसले .... तिचेही निस्तेज डोळे  चमकले ...
कशी आहेस .....? माझ्या प्रश्नावर हसून विचारले .... कशी दिसते ....?  मी किंचित हसून छान दिसतेस ...!  माझ्या बोलण्यावर तीच जोरात ओरडली छान  दिसते?  मी क्षणभर घाबरले .... महिन्यपुर्विच मी हॉस्पिटल मधुन घरी आले .... मला काहीच माहित नाही .... मी .  म्हणजे पुन्हा तुला तसे भास......?? तिच्या डोळ्यात मला तीच ती फोनवरिल अगतिकता प्रत्यक्ष दिसत होती .... हो .... गं .........सांग ना  मी काय करू ...... .?  माझ्याकडेही  या प्रश्नाचे उत्तर नव्हते .  


         वीस वर्षापूर्वी प्रेमभंगातुं न तिला  आलेल्या डीप्रेशने या मनस्वी मुलीला  स्कीजोफ्रेन्फेनियाने घेरले .....!
तिचे भास् तरी कसे .....?  त्या  भासाबाबत  ती  बोलूही शकत नाही .....  असे भास् तिच्या संपूर्ण अस्तित्वाचा घास घेते .....!  मला यातुन   बाहेर   पडायचे  आहे   नाहीतर ते भास् माझा बळी  घेइल .... मीच माझ्या नजरेला नजर भिडवू  शकत नाही .ती हतबल होऊंन  बोलत होती .     "हे बघ असे भास् होउ लागले की लगेच तू ती साखळी दुसरा  विचार मनात आणून तोडून टाक ...  तू  अध्यात्माची पुस्तके वाच ... गुरु प्राथना कर ...... चांगला विचार कर ..... आणि हानून पाड ते घानेरडे विषयासक्त विचार .........! मी तिच्याशी  खुप खुप बोलले  ती  बरीच शांत झालेली वाटत  होती ....... संध्याकाळ  खुप झाली होती ..... तिला माझ्याशी  अजूनही खुप बोलायचे आहे हे दिसत होते पण माझे मन माझ्या लेकीकडे  होते .........!   चल मी निघते परत एकदा भेटू ..... नक्की भेट ....! तू भेटलीस की परत  जगायला हुरूप येतो नाही तर .....तिने एक मोठा उसास सोडला ...... तिला परत  भेटण्याचे कबूल करूंन  मी तिथून निघाले .....


         माझे मन आता तिच्या त्या विचित्र भासांचा विचार करू लागले होते ...... आणि क्षणात मी दचकले ....! आणि मी माझ्या  लेकीचा विचार मनात आणून ती साखळी तोडून टाकली ..  समोर माझी लेक हात पसरून माझ्याकडे झेपावली ......  तिच्याजवळ   असे कुणीतरी  हवे होते ...... ती सर्वार्थी अतृप्त आहे ..........!



                                                                                                                           समिधा