बुधवार, २० एप्रिल, २०१६

"मनोगत"

                                                                    "मनोगत" 
                                                                                                                             २५/४/२०१६

     खरं  प्रेम आपल्या आयुष्यात जाणता अजाणता अगदी नकळत येतं , माझी कविता सुध्दा अशीच नकळत माझ्या आयुष्यात आली आणि आयुष्यच होऊन राहिली ! खरं  तर प्रत्येकाच्या आयुष्यात कविता असते !
कारण कविता म्हणजे सारं भोवतालचं सोसणं असतं , कविता म्हणजे आपणच आपल्याला उसवणं असतं 
कविता म्हणजे एक टाका असतो आपण आपल्याला घातलेला , कविता म्हणजे प्राण असतो जगण्यामध्ये ओतलेला !
माझ्याच कवितेत कवितेला व्यक्त करतांना     .....

"भोवतालचं सोसणं
जेंव्हा असह्य होतं
नाती फाटत , तुटत
भावना उसवत जातात
तेंव्हा तूच येतेस   ....
एक एक टाका टाकत जातेस
सांधत जातेस मला  .
विस्कटलेल्या आयुष्याला
स्वप्नांची ठिगळं लावतेस
सजवून जातेस असं काहीं 
निळ्याभोर आकाशालाही
वाटत राहतं   ....
चंद्रचांदण्यांच्या जागी
स्वप्नांची ठिगळं
शोभून दिसतील !!"

     माझ्यासाठी कविता म्हणजे माझा माझ्याशीच केलेला संवाद असतो ! कविता माझी सर्वात जवळची सखी आहे  .  माझं व्यक्त होणं आणि माझं असणं  यातील खरा फरक माझी "कविता"  मला दाखवून देते , ती माझ्या ख-या अस्तित्वाची ओळख करून देते ! ती माझ्या मनाचा "आधार" आहे , माझ्या जगण्याशी तिचं अतूट असं  नातं आहे !  आयुष्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत माझी कविता सतत माझ्या सोबत होती , तिने मला कधीच "एकटे " पाडले नाही! खरं तर तिच्यामुळेच मी इथवर न कोलमडता, न  मोड़ता, न हरता पोहचले आहे ! माझं जगणं जसे होते तशी ती  माझ्या सोबत राहिली ! खरं तर मी आनंदात असेन  तर ती  फारशी माझ्याकडे फिरकायची  नाही पण जेंव्हा मी  दुःखी , विरह वेदनेत असले  की ती  आवर्जून माझ्यापाशी माझे दुःख हलके करायला येते! " कविता" म्हणजे माझे  "मी" पण आहे! त्यामुळे मला माझ्या आयुष्यात आणि भोवतालच्या जगाकडून जसजसे अनुभव येत गेले तसतसे माझ्या कवितेचे भाव बदलत होते !  त्यामुळे तीचा अनुभव सार्वत्रिक असावा असे मला प्रमाणिक पणे वाटते ! उदा. प्रेमकवितांमधील भाव तर प्रत्येकाच्या ठायी
अगदी  सार्वकालिक आणि सार्वत्रिक असा असतो ! कारण कुणीतरी म्हटलंच  आहे  की ,
" जरुरी नहीं जो शायरी करें , उसे इश्कही हों  ....!!
जिंदगी भी तो कुछ जख्म लाजवाब देतीं हैं  .... !!
आणि म्हणूनच कदाचित माझ्या इतर विषयांच्या कवितांपेक्षा प्रेम कवितांना ब्लॉग वाचकांकडून खुपच चांगला प्रतिसाद मिळाला  !  उदा  .   " आधी मला सांग , तू माझ्या स्वप्नात यायचं बंद का केलंस  ...? " ही कविता आजच्या तरुण पिढीच्या भावविश्वशी जोडून लगेच भिड़ते ! 

     प्रत्येकाच्या आयुष्यातील अनुभव हे त्या प्रत्येकासाठी "मास्टरपीस " असतो  .  माझ्या आयुष्याकडून मीही असेच बरेचसे घेतले आहे   ! आजूबाजूच्या परिस्थितीशी प्रत्येकजण जोडलेला असतो पण प्रत्येकाची त्या जोडण्याची  एक वेगळी प्रतिक्रिया उमटते ! एकच अनुभव पण प्रत्येकाचा  तो अनुभव व्यक्त  करतानाची भूमिका वेगळी असते ! मीही ते अनुभव कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले ! स्रीविषयक जाणिवा प्रत्येक स्रीच्या मनात असतातच पण व्यक्त करण्यासाठी त्यांचे भाव वेगळे असतात !  माझ्या ह्या जाणिवा व्यक्त होताना त्या एका  " मी"  कडून जेंव्हा सुरवात होऊन त्या प्रत्येक स्रीच्या अनुभवाशी जाऊन भिडतात तेंव्हा ती जाणीव फक्त माझी राहू नये ती प्रत्येक स्रीची व्हावी असा माझा प्रयत्न असतो   " इतकं सोप्प नसतं गं " ही कविता लिहितांना माझे स्रीत्व सोप्प नाही ते पेलतांनाचा मला येणारा  अनुभव आहे  ! किंवा " जेंव्हा तुझा राग तू भांड्यांवर काढतेस ..!" ह्या कवितेतही जाणते अजाणतेपणे मी मला व्यकत करते आहे  . तो अनुभव इतर स्रीयांचा ही होऊ शकतो   !
     
    भवतालच्या भ्रष्ट  वातावरणाचे  आपल्या संवेदनशील मनाला पडणारे चरे अगदी आत आत खोलवर चिरत असतात त्यातून  व्यक्त होतानाचा प्रत्येकाचा त्रागा   हा त्या त्या व्यक्तिच्या  स्वभावप्रकृतिप्रमाणे कधी दाहक बंडखोर असतो तर कधी शरणागत असहाय असतो  ! माझ्याकडून आलेला भाव हा दाहक आहे याची प्रचिती माझ्या "इति  मनूष्य मनूष्य:" या सारख्या कवितांमधून येते  !

     अशा  कवितांच्या माध्यमातून  जाणिवेचे नेणिवेचे प्रकटीकरण करत असतांनाच  कवियत्री नीरजा यांच्या "निरन्वय" या काव्य संग्रहाच्या प्रस्तावनेच्या शेवटी प्रा. गंगाधर गाडगीळ  यांनी म्हटले आहे , " कविता म्हणजे कारागिरी नव्हे तर ते एक व्रत आहे ; या गोष्टीची खुणगाठ कवितेने  मनात जपली पाहिजे तरच तिला आपले स्वत्व गवसेल व ती  स्वसामर्थ्याने वाटचाल करू लागेल " हे वाचनात आले आणि हे वाचल्यानंतर खरंतर मला खूप दडपण आले कारण माझी कविता ही माझी अभिव्यक्ती  होती ती व्यक्त होतांना जशी माझ्या आत होती तशीच ती बाहेर येत होती , त्यामुळे माझ्या व्यक्त होण्यात प्रतिभा , तिचे स्वत्व या गोष्टींचे भान माझ्या कवितेत कितपत होते ह्याची मला काहीच जाणीव नव्हती कारण ती माझ्या भावविश्वाशी  अगदी प्रामाणिक होती नव्हे ती माझ्यातल्या जाणिवेची प्रतिक्रया होती  . पण कविता जेंव्हा माझ्या जाणिवेपलीकडे इतर वाचकांच्या जाणिवा ही व्यक्त करेल तेंव्हा मला तिच्यातला खरेपणा अधिक खरा वाटेल आणि म्हणून माझा लहान भाऊ रवींद्र याच्या मदतीने मी माझा कवितांचा ब्लॉग तयार केला आणि  अगदी एक वर्षात त्याला साठ हजरांच्यावर वाचक मिळाले मग मला थोड़ा धीर आला आणि माझ्या मित्र मैत्रिणींना माझ्या कविता व्हाट्सअप , फेसबुक या द्वारे प्रसारित करू लागले तिथेही कवितेतील चांगली जाणती प्रथितयश माणसे ,प्रगल्भ वाचक यांच्याकडून कौतुक आणि मार्गदर्शन मिळत गेले. 

    थोडक्यात कवितांच्या जाणिवे नेणिवेतूनच मी वाचकांमध्ये सामील होऊन हा माझा अनुभव खरच सार्वत्रिक आहे का। ..? या एका जिज्ञासेने " माझे तुला नि:शब्द शब्द " हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला !  " माझे तुला नि :शब्द शब्द"  या शीर्षकातून माझ्या रसिक वाचकांपर्यंत मी माझ्या व्यक्त शब्दांतून पोहचण्याचा प्रयत्न केला आहे  .

                                                                    "  कृतज्ञता  "

     कवितेतील माझी पहिली प्रेरणा आदरणीय  कवयित्री  आसावरी काकडे  यांना या काव्यसंग्रह निर्मितीचे विशेष श्रेय देणे माझ्या साठी गुरूला दक्षिणा दिल्याचे समाधान मिळवून देत आहे .

      या काव्यसंग्रहाच्या निर्मितीचे पहिले श्रेय मी माझे बाबा श्री .  विठ्ठल गोपाळ विशे यांना देते . कारण ग म भ न या अक्षरांपासून ते शब्द आणि शब्दांचे भव्य आकाश माझ्या बाबांनी मला दाखवले ! माझ्यात वाचनाची आवड निर्माण केली  , कविता गोष्टी, कथा अशा  विविधतेने नटलेल्या ग्रंथसंपदांची ओळख करून दिली . कविवर्य अरुण कांबळे यांच्या कवितेचा संदर्भ घेऊन माझ्या बाबांना सांगावेसे वाटते " आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झाला  आहे , नाहीतर हेच शब्द कुठेतरी पडून सडून गेले असते,  माझ्या शब्दांना अर्थघनता दिल्याबद्दल मी तुमची ऋणी आहे बाबा। .. !! 

    "तुझ्या ह्या कविता वाचकांपर्यंत जाण्यासाठी प्रथम त्या तुझ्या म्हणून जपल्या पाहिजेत " असे माझ्या कवितांचे मोल जाणणारे माझे पती श्री . संतोष विनायकराव कर्वे यांनाही या काव्यसंग्रहा  निर्मितीचे हे श्रेय जाते.  

     मैत्री करणे आणि तिच्या सहवासातून परागकण मिळावेत ज्यातून एक नवीन सृजन निर्माण व्हावे अगदी तोच अनुभव मला माझ्या मोजक्याच पण अतिशय प्रिय असलेल्या मैत्रगणातून येत असतो ! माझ्या कवितांचे कधी  कौतुक करून व प्रसंगी कवितेतला फोलपणा दाखवून नेहमीच मला मार्गदर्शन केले आहे . विशेषत: डॉ . प्रतिभा टेंबे  आणि शारदा मंदिर कर्जत-(जि . रायगड ) शाळेची मुख्याध्यापिका सौ . आशा सुनील ठोंबरे यांनी कविता संपादनात आपल्या व्यग्रतेमधून मला मोलाची मदत केली त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे ! शारदा प्रकाशन चे  प्रकाशक प्रा  .   संतोष राणे  यांनी माझ्या कवितांना प्रकाशित करुन एक नवा आयाम दिला  त्यांचेही मी मन:पूर्वक आभार मानते !

    सर्वात शेवटी मी माझ्या आयुष्यात आलेले ज्ञात अज्ञात सगेसोबती ज्यांनी माझ्या आयुष्याच्या ओंजळीत अनुभवांचे कधी चांदणे तर कधी जळते निखारे दिले त्या सर्वांचे मनस्वी आभार !  आणि "काही गाणी गुणगुणता येत नाहीत ती मनातच जपावी लागतात " त्या गाण्यांचेही  आभार !!

                                                             " अर्पण पत्रिका "



                                                         "  श्रीकृष्णार्पणमस्तू "


                                                                                                          सौ . पुष्पांजली संतोष कर्वे